शिक्षकाकडून १६ लाखांची लाच घेतल्याचा आरोप; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी शालिनी श्रीवास्तव अटकेत
शिक्षकाकडून १६ लाखांची लाच घेतल्याचा आरोप;
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी
शिक्षणाधिकारी शालिनी श्रीवास्तव अटकेत
नवी दिल्ली/वृत्तसेवा
शिक्षक कृष्ण मोहन सिंग आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलंबित प्राथमिक शिक्षण अधिकारी (बीएसए) शालिनी श्रीवास्तव यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतून अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त करणे, लाचखोरी आणि मानसिक छळाच्या गंभीर आरोपांमुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआर नोंद झाल्यापासून त्या फरार होत्या. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, तर गोरखपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) डॉ. कौस्तुभ यांनी त्यांच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
प्रकरणाची सुरुवात देवरिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक कृष्ण मोहन सिंग यांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. १ जुलै २०१६ रोजी त्यांची कृषक लघु माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, २०२३ मध्ये त्यांची तसेच इतर दोन शिक्षकांची नियुक्ती कथित अनियमिततेच्या कारणावरून रद्द करण्यात आली. या निर्णयाविरोधात कृष्ण मोहन सिंग यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने नियुक्ती रद्द करण्याचा आदेश रद्द करून संबंधित प्रकरणात नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यानंतर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन बीएसए शालिनी श्रीवास्तव आणि त्यांचे डेस्क असिस्टंट संजीव सिंग यांनी प्रत्येकी १६ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मृत शिक्षकाच्या पत्नी गुडिया सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कृष्ण मोहन सिंग, ओंकार सिंग आणि अपर्णा या तीन शिक्षकांकडून एकूण ४८ लाख रुपये उकळण्यात आले. ही रक्कम उभारण्यासाठी शिक्षकांनी दागिने गहाण ठेवले, तसेच नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते. एवढे करूनही आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू ठेवली आणि शिक्षकांचा सतत मानसिक छळ केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या आर्थिक आणि मानसिक दबावामुळे त्रस्त झालेल्या कृष्ण मोहन सिंग यांनी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी गोरखपूरच्या गुलरिहा परिसरातील आपल्या मोठ्या भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ संदेश तयार करून ठेवला होता.
सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये कृष्ण मोहन सिंग यांनी तत्कालीन बीएसए शालिनी श्रीवास्तव, डेस्क असिस्टंट संजीव सिंग आणि इतर काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नमूद केले की, न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून १६ लाख रुपये घेतले गेले आणि त्यानंतर आणखी ४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सततचा मानसिक छळ, भ्रष्टाचार आणि पैशांसाठीचा दबाव यामुळेच आपण आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते.
कृष्ण मोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या पत्नी गुडिया सिंग यांनी गोरखपूरमधील गुलरिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शालिनी श्रीवास्तव, संजीव सिंग आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, लाचखोरी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. प्राथमिक तपासात तक्रारीतील आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे आढळल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली. अखेर अनेक महिन्यांच्या शोधमोहीमेनंतर शालिनी श्रीवास्तव यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून, या बहुचर्चित प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या