राम मंदिरातून पैशांसह सोने-चांदी व हिऱ्यांनी जडवलेल्या १२५० शिला गायब झाल्याचा दावा; अयोध्येत नवा वाद
राम मंदिरातून पैशांसह सोने-चांदी व हिऱ्यांनी जडवलेल्या १२५० शिला गायब झाल्याचा दावा;
अयोध्येत नवा वाद
नवी दिल्ली/वृत्तसेवा :
अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित आणखी एक वाद समोर आला असून, मंदिर उभारणीसाठी देश-विदेशातून भक्तांनी अर्पण केलेल्या सुमारे १,२५० मौल्यवान शिला (दगड) गायब झाल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या शिलांमध्ये सोने, चांदी, हिरे, माणिक तसेच विविध धातूंनी बनविलेल्या आणि रत्नजडित शिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर आंदोलनाच्या काळात तसेच त्यानंतर देशभरातून आणि परदेशातून श्रद्धाळूंनी विशेष शिला अयोध्येला पाठविल्या होत्या. यामध्ये मॉरिशसमधून आलेली एक अत्यंत मौल्यवान शिला तसेच मुंबईतील एका उद्योजकाने दान केलेली हिऱ्यांनी जडवलेली शिलाही असल्याचे वृत्त आहे. अनेक शिला सोने, चांदी आणि इतर धातूंनी तयार करण्यात आल्या होत्या.
शिलांच्या नोंदीवरून निर्माण झाले प्रश्न
या शिलांच्या जतन आणि सुरक्षेची जबाबदारी वेगवेगळ्या काळात विविध समित्या आणि संस्थांकडे होती. मात्र, आता या शिलांचे नेमके काय झाले, त्या कुठे ठेवण्यात आल्या आहेत, याबाबत कोणतीही स्पष्ट आणि सार्वजनिक माहिती उपलब्ध नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सुमारे १,२५० शिलांचा मागोवा लागत नसल्याचे आरोप होत आहेत.
या प्रकरणी संबंधितांकडून स्पष्टीकरणाची मागणी होत असून, भक्तांनी अर्पण केलेल्या मौल्यवान शिलांचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम किंवा संशय राहणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
संतोष दुबे यांचा गंभीर आरोप
धर्मसेनाचे संस्थापक संतोष दुबे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून देश-विदेशातून अयोध्येत आणलेल्या सोने, चांदी, हिरे, माणिक आणि अष्टधातूंच्या सुमारे १,२५० शिला आता बेपत्ता आहेत.
दुबे यांच्या दाव्यानुसार, या शिला २००२ पर्यंत कारसेवकपुरम येथे सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मातीच्या शिला अद्याप तेथे उपलब्ध आहेत; मात्र धातूंच्या शिलांचा कोणताही ठावठिकाणा नाही. त्यांनी असा आरोपही केला आहे की, या शिलांच्या देखभालीची जबाबदारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे होती. ज्या ठिकाणी या शिला ठेवण्यात आल्या होत्या, ती जागा कुलूपबंद करण्यात आली होती. त्यानंतर या शिलांचे काय झाले, याची माहिती कोणाकडेही नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
देणगी चोरीच्या प्रकरणानंतर वादाला तोंड
राम मंदिरातील देणगी चोरीच्या अलीकडील प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी देणग्या मोजणाऱ्या पथकात नव्याने नियुक्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने ७ जून रोजी नोटांचे एक बंडल लपविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते.
या घटनेनंतर झालेल्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याने देणग्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातील काही माहिती उघड केल्याचे सांगितले जात आहे. ९ जून रोजी ही बाब सार्वजनिक झाल्यानंतर हा विषय राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या मुद्द्यावरून सरकार आणि मंदिर ट्रस्टवर टीका केली आहे.
ट्रस्टकडून अद्याप सविस्तर स्पष्टीकरण नाही
या सर्व आरोपांबाबत मंदिर ट्रस्टकडून अद्याप कोणतेही सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कथितरीत्या गायब झालेल्या शिलांची अधिकृत नोंद काय आहे, त्या कुठे ठेवण्यात आल्या आहेत आणि याबाबत पुढे कोणती भूमिका घेतली जाणार आहे, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
दरम्यान, १२ जून रोजी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मंदिरातील देणग्यांचे नियमितपणे लेखापरीक्षण (ऑडिट) केले जात असल्याचा दावा केला. तसेच देणगी व्यवस्थापनात कोणतीही अनियमितता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर
भक्तांच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या या प्रकरणामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित आरोपांना अधिकृत दुजोरा मिळाल्यास किंवा चौकशीमध्ये काही निष्कर्ष समोर आल्यास, या प्रकरणावर देशभरात मोठी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या