देऊळगावराजा येथे ‘होय होय वारकरी’ ; एक दिवसीय संतविचार परिचय शिबिराचे आयोजन
देऊळगावराजा येथे ‘होय होय वारकरी’
एक दिवसीय संतविचार परिचय शिबिराचे आयोजन
देऊळगावराजा :
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेतील विचारांचा परिचय करून देण्यासाठी आणि संतांच्या समतावादी, मानवतावादी संदेशाचा प्रसार करण्यासाठी 'संत विचार प्रसारक मंडळाच्या' वतीने आणि संविधान जागर अभियानाच्या सहयोगाने ‘होय होय वारकरी’ हे एक दिवसीय संतविचार परिचय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देऊळगावराजा येथील शिवरकर बिल्डिंग, नवीन नगरपालिकेशेजारी येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरासाठी ह.भ.प. भारत महाराज जाधव (मठाधिपती, श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम (मठ), पंढरपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून ते संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंतची गौरवशाली संतपरंपरा लाभली आहे. या संतांनी समाजात समता, प्रेम, बंधुता, मानवता आणि सामाजिक प्रबोधनाची मूल्ये रुजविण्याचे कार्य केले. “अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक” या संतविचारातून सर्व मानवजातीच्या कल्याणाचा संदेश दिला गेला.
आजच्या काळात समाजात वाढत चाललेला द्वेष, हिंसा आणि विविध सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर संतांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. या विचारांचा अभ्यास करून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
संतविचार समजून घेण्याची आणि प्रबोधनाच्या वारीत सहभागी होण्याची ही एक उत्तम संधी असल्याने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, वारकरी व संतसाहित्य अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'संत विचार प्रसारक मंडळाच्या' वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या