१५ वर्षांनंतर न्याय! रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप; २०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
१५ वर्षांनंतर न्याय!
रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप
२०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
वाशिम, दि. २ (वृत्तसेवा)
वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात २०११ मध्ये घडलेल्या गाजलेल्या पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २) ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला. तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या न्यायालयीन लढ्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ९ मे २०११ रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेग्या पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी बेग्या पवार यांना पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप होता. या मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि १० मे २०११ रोजी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला. सीआयडीने अवघ्या ३४ दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनाचा तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. न्यायवैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे, मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ आरोपी पोलिसांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. बेग्या पवार यांच्या आईने सुरुवातीपासूनच आपल्या मुलाला पारधी समाजातील असल्याच्या पूर्वग्रहातून खोट्या गुन्ह्यात अडकवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पोलीस कोठडीतील अत्याचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात न्यायालयाने घेतलेली कठोर भूमिका म्हणून या निकालाकडे पाहिले जात असून, कायद्यापुढे कोणीही मोठे नसल्याचा ठाम संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रकरण एका नजरेत
- ९ मे २०११ : वाढोणा येथून बेग्या पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- १० मे २०११ : पोलीस कोठडीत मारहाणीमुळे बेग्या पवार यांचा मृत्यू.
- सीआयडी तपास : ३४ दिवसांत तपास पूर्ण; खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
- २ जुलै २०२६ : वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
- शिक्षा : तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप.

टिप्पण्या