अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?

 अपात्रतेचा निकाल तर लागला ..

आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?



सिंदखेडराजा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी पक्षीय व्हीप नाकारला म्हणून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या ह्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मे २०२३ नंतर देण्यात आले.

ह्या प्रकरणाच्या सुनवाईत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यामध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ तसेच बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेले निर्देश चुकीचे असल्याचे म्हटले होते. तिसरी बाब म्हणजे जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांनाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही स्पष्ट केले होते.

जसे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले त्यानंतर निकाल उशीरा देण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी वेळकाढूपणा अवलंबवण्यात आल्याचे प्रकारही घडले. त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती. 

विधानसभा अध्यक्षांनी शेवटी १२०० पाने वाचल्यानंतर एकदाचा निकाल लागला.

निकाल लागल्यानंतर न्याय कुणाला मिळाला व अन्याय कुणावर झाला? ही बाब राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य जनतेच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामध्ये बहुतांश राजकारण्यांनी निर्णय आपल्या राजकीय सोयीनुसार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिक मात्र व्यक्त न होता, आपल्या सदसद्विवेकबुद्धी नुसार निवडणुकीत कोणते बटन दाबायचे ह्या निर्णयापर्यंत पोहोचला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे सगळं प्रकरण घडत असतांनाच, युती व आघाडीतील घटक पक्षात अचानक बदल झाले. त्यामुळे राज्यभर राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षात तर कोण व्यक्ती कोणत्या गटाची हे ऐनवेळी कळेनासे झालेले आहे, त्यासाठी मेंदूवर जोर देऊन संदर्भ लक्षात घ्यावे लागतात.

मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. ज्या दोन राजकीय पक्षांची दोन शकले झालेली आहेत, आजीमाजी आमदार त्याच पक्षांचे आहेत. ते आपापल्या परीने हालचाली करीत असतांना इतरही पक्षांचे व अपक्ष इच्छुकही कामाला लागले आहेत. त्यामुळे सत्तेची समीकरणे काय राहतील? ह्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न ...

मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचा राजकीय परीक्षेप लक्षात घेता, ह्या मातीतील राजकीय वाटचाल गांधींचे विचार घेऊन काँग्रेस व  जनपद पासून सुरु झाली आहे. आजकाल राजकारणात उपटसुंभासारखे जे भडक विचार अचानक दाखल होऊन मस्तक चक्रावतात. तसले चित्र त्यावेळी नव्हते. दिलेल्या शब्दासाठी जो प्रामाणिक राहू शकतो, सर्वसामान्य जनता त्याच्या पाठीशी उभी राहायची. त्यानंतर सहकार क्षेत्राशी निगडित चळवळीने राजकीय क्षेत्र काबीज केले. त्यापुढे जातीय समीकरणे उभी राहिली. त्याचा परिणाम अजूनही दिसत असला तरी, युवक वर्ग प्रचंड जागरुक झाल्याचेही विविध अनुभवातून दिसून येते. फक्त सत्तेसाठी पंधरा लाख देतो, ह्या बोगस उक्तीप्रमाणे मतदारसंघाचा विकास करतो म्हणत, एवढे आणले तेवढे आणले म्हणणाऱ्या बांडगुळांची पैदास ह्या मातीत आताशा दिसत व उमटून पडत आहे.

हे बेगडी चित्र सोडत, मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात उमेदवारीचा विचार केला तर राज्यात जी महायुती म्हणजे शिवसेना (शिंदे गट) + भाजप + राष्ट्रवादी (अजित गट) हे सध्या सत्तेत आहेत, त्यांचे समर्थक डॉ. राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार आहेत. तर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर जे डॉ. शिंगणे ह्यांचे विरोधक समजले जातात, नव्हेतर अजूनही ठासून विरोध करतात. ते शिंदे गटाचे समर्थक असल्याने, उमेदवारी बाबत त्यांचीही गोची झालेली आहे. हे चित्र असतांनाच खेडेकर यांनी उबाठा गटाकडून उमेदवारी घ्यावी, ही बाब त्यांचे समर्थक बोलून दाखवत असल्याचे आढळून येते.  विद्यमान खासदार प्रतापराव जाधव ह्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत आ. डॉ. शिंगणे ह्यांनी मोठ्ठे आव्हान दिले होते. सद्यस्थितीत मात्र दोघेही एकाच गटात असल्याने खासदार जाधव हे डॉ. खेडेकर ह्यांना कसा काय पाठिंबा देऊ शकतील? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेच्या समीकरणात महायुती असल्याने भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचीही गोची झालेली आहे. तरीही ओबीसीच्या नावावर पंकजाताई यांचे नाव घ्यायचे, नव्हेतर कट्टर निष्ठावान असलेले दर्शवायचे. अन सत्ता व उमेदवारी ह्यासाठी आपण मात्र नुकतेच फडणवीस ह्यांच्याशी अंडरग्राउंड जुळवून घेतल्याचे "निदान" राजकीय रुग्णांना सांगणारे महाभागही राजकीय पटलावर आहेत. 

राज्यात विरोधी पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) + काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार गट) ह्यांच्याकडून उमेदवारी बाबत समीकरण निश्चित माहीत नसले तरीही, इतिहास बघता ह्या मतदारसंघात उमेदवारीमध्ये उबाठा गटाचा प्रथम दावा ठरु शकतो. परंतु, ज्यांना दिगग्ज म्हटल्या जाते, ते शिंदे गटाशी संधान साधून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात भाकीत करता येणे शक्य नाही. तरीही मतदारसंघात एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळख व चांगला जनसंपर्क असलेल्या सामान्य व्यक्तीलाही  जरी उमेदवारी दिली तरीही ते एक तगडे आव्हान ठरु शकते. 

मागच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची सुद्धा उमेदवारी होती. मात्र त्यांचे उबाठा गटाशी संधान साधणे सुरु असल्याने चित्र अधांतरी आहे.

त्यातच ज्यांचा विधानसभा मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे त्यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे, सविताताई मुंढे, तोताराम कायंदे, विनोदभाऊ वाघ, डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे इत्यादि.

मतदारसंघात काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, संघटना व चळवळी आदिंचा सुद्धा चांगला पगडा दिसून येतो. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकीय आखाड्यात उडी घेत शड्डू ठोकले नसले तरीही सध्याच्या राजकीय गोंधळाची बजबजपुरी उतली असतांना, त्यांचाही ऐनवेळी राजकीय चंचुप्रवेश नाकारता येत नाही. 

एकंदरीत मातृतीर्थ  सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणाशी मिळतीजुळती परिस्थिती असली तरीही, ह्या मातीतील राजकीय वैचारिक भूमिका, सहकार चळवळ, वैयक्तिक निष्ठा, सच्चाई कळणारे युवक सोबतच विविध चळवळी ह्या सगळ्या बाबीतून सर्वसामान्य जनतेची सहानुभूती नेमकी कुणाच्या पाठिशी उभी राहते? हे सध्या सांगता येणार नसले तरी घोडा मैदानातील व वेळेवर निर्माण होणारी परिस्थिती येत्या काळात ठरणार आहे, एवढे मात्र खरे ..!

टिप्पण्या

  1. एकनिष्ठ, प्रामाणिक , जनसंपर्क असलेला सामान्य माणूस शेवटी असला तरी संधी मिळाल्यास तो जायंट किलर ठरु शकतो....

    उत्तर द्याहटवा
  2. अजून चित्र स्पष्ट होण्यासाठी वेळ लागणार

    उत्तर द्याहटवा
  3. सर उत्तम आणि दर्जेदार राजकीय विश्लेषण मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ? जबरदस्त

    उत्तर द्याहटवा
  4. मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने बऱ्यापैकी मतदान घेऊन आपला प्रभाव पाडल्याने यावेळी सविता ताई बाजी मारणार दुसरे कारण प्रस्थापित पक्ष, पक्षनिष्ठा हे सर्व अलबेल जाणवते.

    उत्तर द्याहटवा
  5. दादा ,खूप छान लिखाण , हे सर्व सामान्यांच्या मनात् येणारे प्रश्न असून येणाऱ्या काळात निष्ठावान उमेदवारांना च मतदारांनी संधी द्यावी.मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा जातीचा किंवा धर्माचा असो.मतदारांचे मत वायाला आणी नये यासाठी फक्त निष्ठावान उमेदवाराला मतदारांनी संधी द्यावी.

    उत्तर द्याहटवा
  6. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र लक्षात येईल

    उत्तर द्याहटवा
  7. क्रमवारी मधे dr खेडेकर जे आमदार झाले नाहीत त्यांचे नंतर हे खूप झाले केवळ लेखन हे निरपेक्ष नाही तर जातीय भावनेतून दिसते आणि कोणत्या नेत्याने 15 लाख देतो असे सांगितल होते की वेगळी घोषणा होती हे एकदा जाणकार पत्रकाराने समजून घ्यावे 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  8. या वेळेस दोघांच्या दोघांच्या भाडणात तिसरा येणार म्हणजेच वंचित बहुजन आघाडी कारण शिंगणेना उमेदवारी मिळणार खेडेकर साहेब बंडखोरी करणारं असं मला वाटतं 🙏

    उत्तर द्याहटवा
  9. वरील बदलत्या राजकीय समीकरणात सर्वात जास्त राजकीय गोची ही गत अनेक वर्षांपासून भाजपद्वारे आमदारकी मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणारे माजी आमदार तोताराम कायंदे,डॉ.गणेश मांटे, विनोद वाघ यांची व शिंदे गटाद्वारे पुनश्च आमदारकी मिळवण्यासाठी सक्रिय असलेले डॉ.शशिकांत खेडेकर यांची होत असतांना दिसत आहे.
    तसं पाहिलं तर डॉ.शिंगणेना राजकीय पर्याय कोण होऊ शकेल ? या प्रश्नाचे उत्तर हे तोताराम कायंदे व डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याजवळ जाऊनच थांबते !! परंतु वरील प्रमाणे राजकीय खिचडी झालेल्या समीकरणात कदाचित !! जर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला तर मनोज कायंदे किंवा सविताताई मुंढे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
    खासदार प्रतापराव जाधव आपल्या राजकीय लाभासाठी डॉ.शिंगणेंशी कधीही जमवून घेऊ शकतात व डॉ.खेडेकरांना उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर काढू शकतात !! परंतु दिसना दादा हे जर तर आहे !! निवडणूक लागेपर्यंत अजूनही वादळी घडामोडी घडण्याची शक्यता आहे !!

    उत्तर द्याहटवा
  10. दोन प्रस्थापित राजकीय नेत्यांमधील ही लढाई असेल...बंडखोरी नक्कीच होणार हे नक्की दिसते...कारण सत्ता किंवा आमदारकी हे ध्येय असलेल्या राजकीय व्यक्तींना या शिवाय जमत नाही...मतदार संघात जो आमदार लिडिंग असतो त्या पक्षाचा दावा अधिक भक्कम मानला जातो!

    उत्तर द्याहटवा
  11. सध्याची समीकरणे चुकीचे ठरतात ऐनवेळी परिस्थिती वर सर्व अवलंबून राहणार प्रभू शंकर मांटे

    उत्तर द्याहटवा
  12. दादा, उमेदवार असा पहिजे जो M.I.D.C,समृद्धी मार्गामुळे green caridour, मतदार संघात बंद पडले उद्योग सुरू केला पहिजे. जाती पाती चे राजकारण बंद झाले पहिजे. तरुण मंडळी यांना रोजगार उपलब्ध करून दिले पहिजे. असा उमेदवार निवडून आला पहिजे.

    उत्तर द्याहटवा
  13. डॉ.राजेंद्र शिंगणे व शशिकांत खेडेकर हे दोघे ही गद्दारच आहेत...यांनी स्वतः च्या फायद्या साठी मतदार संघाला वेड्यात काढत आले आहेत.
    निष्क्रिय आमदार याना स्वतःच काम करण्या ची इच्छा नाही,आणि डॉ.खेडेकर म्हणजे टक्केवारी पुरुष आहेत हे सर्व जनतेला कळून चुकले आहे..सत्ते साठी बाप बदलणारे हे लोकं आहेत यांच्या कडून काय अपेक्षा करणार विकासाची.
    शिंगणे रडून आमदार झाले मागच्या वेळेस आता सिंदखेडराजा ल नवा चेहरा पाहिजे ,युवांना रोजगार संधी नाही.संभाजीनगर, पुणे,मुंबई इकडे युवक कमा साठी स्तलांतरित होत आहेत.यांना फक्त सत्ता हवी.याला संपूर्ण मतदार संघाचे जनता जबाबदार आहे. आता वेळच बदलाची आहे ,फक्त सावडण, लग्न, ल येणारा नेता नको तर कामे करणारा माणूस पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  14. यावेळी नक्कीच बदल होणार अन नवीन चेहरा येणार

    उत्तर द्याहटवा
  15. आपण कितीही म्हटलं तरी सिंदखेडराजा मध्ये वंजारी समजाचा उमेदवाराला बाकीचे मतदार मतदान करत नाहीत ,याचाच फायदा, शिंगणे घेत आले आहेत ,इथे फक्त मराठा समाजाचा उमेदवारच टक्कर देऊ शकतो..म्हणून या तुमच्या बातमी ल काही अर्थ नाही,वंजारी समजचा उमेदवार 40 हजार मतदान च्या वर मतदान घेऊ शकत नाही त्यात दोन वंजारी उमेदवार उभे केले तर यात भाग पाडतो वं याचा फायदा सरळ सरळ डॉ. शिंगणे यांना होतो... न्यूज लिहण्याचा आधी स्वतः थोडा सर्वे करा आधीचे निकाल Google la Available आहेत त्याचा Study kara.

    उत्तर द्याहटवा
  16. साखरखेर्डा हे ऐतिहासिक गाव आहे असे म्हणतात.पूर्वीचं नाव (फत्ते खेर्डा) एका ऐतिहासिक लढाईत विजय मिळाला म्हणून फत्ते खेर्डा नाव पडले असा इतिहास आहे. तेव्हाची लढाई तर फत्ते झाली. परंतू साखरखेर्डा परीसरातील अनेक गावे. याच खेर्ड्याला जोडलेली आहेत. ते ज्या ज्या कामानिमित्त खेर्ड्याला येतात. तेव्हा त्यांना किती अडचणीचा सामना करावा लागतो. याचा विचार गेल्या तिस वर्षापासून कोणीच केला नाही. येथे प्रवाशांना बसण्याकरीता साधा प्रवाशी निवारा नाही. सर्वत्र अतिक्रमण, अस्वच्छता, अरेरावी, दादागिरी, वाहतूकीच्या नियमांना तिलांजली. ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना स्वच्छतागृहांची सोय. नेहमी दारुड्यांचा, आणि डांबरटांचा कोलाहल, नुसता गलका. खेड्यातील लोकांना या खेर्ड्यात येवून फायदा तर होतच नाही पण या सर्व अडचणीचा सामना करावा लागतो. सरकारी व इतर बॅंकांचे अनुभव तर आणखीच भरीत भर घालणारे. एजंट ,किंवा वशीला लावल्याशिवाय किंवा पैसा दिल्याशिवाय कामच होत नाही. सार्वजनिक वाहतूक तर वाळवंटात जास्त चांगली असेल अशी इथली अवस्था आहे. तालुक्याला जायचं असेल तर प्रश्न पडतो संध्याकाळी घरी येवू का नाही, का मुक्काम करावा लागेल? जी अवस्था खेर्डयाची तीच सिंदखेड्याची. तीच तालुक्याची, ह्या राजकारण्यांना वाटतं की मौत, मुंज, जावळं, लग्न, वाढदिवस रक्षा विसर्जन या कार्यक्रमाला हजेरी लावली, आणि पोलिस्टेशनला आलेला वाद चिघळला किंवा मिटवला म्हणजे जनतेचा परिपूर्ण विकास झाला. **जगात काय चालले हे मतदार संघाला माहित नाही आणि सिंदखेडराजा मतदारसंघ कोठे आहे हे जगाला माहित नाही.** उडत गेला आमदार खासदार,
    उडत गेला नेता, आता एकच काम दाबा नोटा.

    उत्तर द्याहटवा
  17. सध्या तरी अनेक बाबी स्पष्ट होणार नाहीत, कारण कोणकोणते बागड बिल्ले कुठल्या बिळात जाऊन बस्तान बसवितील याचा नेम नाही.....

    उत्तर द्याहटवा
  18. सद्यपरिस्थितीवर वृत्तविश्लेषण एकदम छान लिहिले सर...पण लोकसभेनंतरच विधानसभा उमेदवार व राजकीय चित्र स्पष्ट होईल..

    उत्तर द्याहटवा
  19. लोकसभा निवडणुकीत नंतर चित्र स्पष्ट होईल

    उत्तर द्याहटवा
  20. घोडा मैदान समोरच।
    दुसऱ्याचा बाप पळवण्याचा प्रकार जनतेला किती मान्य हे काळच ठरवेल

    उत्तर द्याहटवा
  21. सिंदेडराजा राजा विधान सभा सर्कल चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार कुणाल तारणार नी कुणाला घेरनार जाणता ठरविणार.
    कुणी कुणाची लावणार, काय गणितं असणारं गावातील गट, पंच्यात, तरुण, महिला बचत गट, तसेच कुणी कोन पडला नी कोन आणला हे पण हातभार लावण्यासाठी तयार आहे.

    उत्तर द्याहटवा
  22. उत्तम आणि दर्जेदार विश्लेषण

    उत्तर द्याहटवा
  23. विश्लेषण छान आहे,
    फक्त अजून सोप्या भाषेत हवे होते..

    परीक्षेप वगैरे हे ग्रामीण भागात कळत नाही.
    या मतदार संघात विकास निधीच्या गप्पा जेवढे माजी आमदार हाणतात, हे जे तुम्ही नाव न घेता मांडले.. तसा या मतदारसंघातील सुदृढ असलेला सहकार कसा हातबल झाला आहे ? याचीही राजकीय कारणे द्यायला हवी होती !

    - राजेंद्र काळे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏