यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे
वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
सिंदखेडराजा:- यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व त्यामध्ये अपयशाने गर्भगळीत न होता, त्याकडे दुर्लक्ष करीत, अभ्यासात शेवटपर्यंत सातत्य ठेवावे लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेतील गुणवंत गौरव गंगाधर कायंदे याने केले. देऊळगावराजा येथील योगीराज लॉन्स येथे दि. २५ जून, रविवारी संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा-जालना यांच्यावतीने आयोजित 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मान व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात गौरव कायंदे सत्काराला उत्तर देत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे, तर हभप सानप गुरुजी, प्रा.गंगाधर कायंदे, राजेंद्र वाघ, जालिंदर बुधवत, विनोद वाघ, सौ. नंदाताई कायंदे, सौ. शारदाताई जायभाये, आत्माराम कायंदे, भगवान मुंढे, देवानंद कायंदे, दादाराव खार्डे, गणेश मांटे, प्रकाश गीते, रमेश कायंदे, तोताराम नागरे, सावळाराम नागरे, बद्री बोडखे, डॉ. केशव आघाव, युवराज नागरे, वामनराव आघाव, अमोल काकड, शंकर उगलमुगले आदि प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक विलास जायभाये यांनी प्रतिष्ठानची संकल्पना विस्ताराने मांडली यामध्ये सन २००० पासून सामाजिक कार्य करीत असताना संत श्री भगवानबाबांनी व्यक्त केलेला शिक्षणाचा मार्ग दिशादर्शक ठरला. त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सन २०१८ मध्ये संतश्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठानाची स्थापना बुलढाणा आणि जालना जिल्ह्यासाठी करण्यात आली. त्यानंतर संतश्री भगवानबाबा विद्यार्थी मदतनिधी, वंजारी समाज वधुवर मेळावा, गाव तिथे अभ्यासिका, विदर्भ वंजारी समाजरत्न सन्मान व गुणवंतांचा कौतुक सोहळा आदि संकल्पनांवर कार्य केले व या पुढे काळानुसार विविध उपक्रम राबविले जातील असे सांगितले. या सर्व गोष्टींसाठी सामान्य समाज बांधवांची भरभक्कम साथ ही समर्थ बाजू असल्याचे विलास जायभाये यांनी सांगितले. त्यानंतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदि विविध क्षेत्रातील नेत्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.
सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे गौरव गंगाधर कायंदे यांना "प्रथम विदर्भ वंजारी समाजारत्न" या सन्मानाने गौरवण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रवीण गीते यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार तोताराम कायंदे यांनी समाजोपयोगी उपक्रमांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा, अशी कळकळ व्यक्त केली. कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेतील व सोबतच दहावी, बारावी, सीईटी, नीट, जेईई परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार अर्जुनकुमार आंधळे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश वनवे यांनी केले. यशस्वीतेसाठी विलास जायभाये, शरद उत्तमराव डोईफोडे, बाळू उत्तमराव डोईफोडे, समाधान जायभाये, समाधान घुगे, भीमराव चाटे, सुरेश वनवे, अविनाश नागरे, प्रल्हाद कायंदे, डॉ. पवन नागरे, राजेश नागरे, गणेश इलग, शरद नागरे, संदीप डोईफोडे, निलेश गीते, बाबासाहेब गीते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏