साखरखेर्डा येथे गॅस सिलिंडर टंचाईचा स्फोटक मुद्दा; नागरिक त्रस्त, एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्न रांगेत उभे राहूनही सिलिंडर नाही; “टंचाई नाही” म्हणणाऱ्या यंत्रणेवर लोकांचा संताप
साखरखेर्डा येथे गॅस सिलिंडर टंचाईचा स्फोटक मुद्दा; नागरिक त्रस्त, एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्न
रांगेत उभे राहूनही सिलिंडर नाही; “टंचाई नाही” म्हणणाऱ्या यंत्रणेवर लोकांचा संताप
साखरखेर्डा (प्रतिनिधी):-
साखरखेर्डा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले असून, सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आज सकाळी समोर आलेल्या दृश्यांमध्ये ग्राहकांनी स्वतःचे रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलिंडर न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक बनला असताना, अशा प्रकारे निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी आहे. महिलांना विशेषतः या टंचाईचा मोठा फटका बसत असून, पर्याय नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
दरम्यान, या टंचाईमागील वास्तव काय आहे, याबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे. काही नागरिकांनी गॅस पुरवठा व्यवस्थेतील संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता, “गॅसची कोणतीही टंचाई नाही” असा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात दिसणारी परिस्थिती याच्या पूर्णतः विरोधात असल्याने, “टंचाई कृत्रिमरीत्या निर्माण केली जात आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सीच्या कामकाजावर संशयाची सुई वळली आहे. स्थानिक पातळीवर चर्चेत असलेली बाब म्हणजे, या एजन्सीचे संचालक हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित राजकीय व्यक्ती असून, त्यांनी राज्य व केंद्रातील बड्या नेत्यांशी वैयक्तिक संबंध असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ग्राहकांच्या मते, “जर खरोखरच गॅसची टंचाई नसेल, तर एजन्सीकडून पुरवठादारांकडे वेळेवर मागणी का केली जात नाही? की आर्थिक कारणांमुळे मागणीच केली जात नाही?” असे थेट प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. या सर्व घडामोडींमुळे एजन्सीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी सिलिंडर वितरणात प्राधान्यक्रम, ओळखी-पहिचान किंवा अन्य अनियमितता होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना अधिकच तीव्र होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा, येत्या काळात या प्रश्नावर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏