कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र
कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय
राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ
वृत्तविश्लेषण
✍️दीसना✍️
सिंदखेडराजा:- अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १ डिसेंबर, मंगळवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी विविध माध्यमातून संपर्क साधणारे उमेदवार तसेच त्यांचे समर्थक आदि सर्वांनाच मतदार शिक्षक तेवढ्याच आत्मीयतेने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका कोण उमेदवार यशस्वी होईल? ह्याची शास्वती सध्या तरी नाही. मात्र मतदार शिक्षकांच्या चर्चेतून राजकीय पक्षांनी दिलेले (लादलेले) उमेदवार सोडून अपक्ष उमेदवारातच प्रमुख लढत रंगणार असल्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पडघमावर वर्षभरापूर्वी पासूनच टिपरी पडली आहे. तेंव्हापासून इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. मात्र ह्या वर्षी मार्च मध्ये कोरोना संसर्गाचा दांडू आडवा आल्याने ह्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेला अडथळे निर्माण झाले. त्यातही अनेकांनी माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांमध्ये स्वतः तसेच चमुंच्या माध्यमातून भेटी दिल्या. परंतु प्रचारात जोर दिसून आला नाही. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर शाळा बंदच होत्या. त्यामुळे प्रचारात खंड पडलेला आढळला. गेल्या २१ नोव्हेंबर पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये सुरु झाली असल्याने पुन्हा प्रचाराची धुमाळी सुरु झाली. मात्र त्यात चुरस दिसून आली नाही.
या दरम्यान जे शिक्षक मतदार आहेत, त्यांनी येणारा प्रत्येक उमेदवार व त्याच्या समर्थकांना सारख्याच पद्धतीने प्रतिसाद दिल्याचे यावेळी आढळून आले.
ह्या मतदारसंघात धनाढ्य व प्रसार माध्यमांद्वारे शिक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे व त्यांची मते काबीज करण्याचे काहींचे सत्तापिपासू मनसुबे ओळखणार नाही? असा शिक्षक सापडणे आजच्या काळात तरी कठीणच आहे. तरीही पॅकेजद्वारे प्रसारमाध्यमे मॅनेज करीत शिक्षकांमध्ये आपणच कसे योग्य आहोत, हे दर्शविण्यासाठी उबार उद्योग शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहणार.
यापूर्वी वेगवेगळ्या विचारसरणीच्या शिक्षक संघटना उमेदवार उभे करीत असत. मात्र आता राजकीय पक्षांनी उमेदवार देऊन शिक्षकांच्या विकासकारणात राजकारण घुसवत ह्यामध्येही उडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
मात्र समाजाला आकार देण्यात प्रमुख व बिनीचा घटक असलेला शिक्षक वर्ग हे सर्व राजकारण ओळखून आहे. यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यापेक्षा नेमकेपणाने काय करायचे? हे शिक्षकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. "वाद किंवा तंटा" उभा केल्याशिवाय ह्या सत्तापिपासू राजकारण्यांना आपल्या मताद्वारे सणसणीत उत्तर देण्याच्या उद्देशाने शिक्षक कंबर कसून उभे असल्याचे शिक्षकांच्या चर्चेतून समोर येत आहे.
जाहीरनामे, वचननामे, भेटवस्तू, आमिषे आदिंना शिक्षक नक्कीच भुलणार नाही. आलेल्या व भेटलेल्या सर्व बाबींची शहानिशा करीत योग्य पद्धतीने उमेदवार निवडण्यात शिक्षक आपली बुद्धिमत्ता पणाला लावतील.
आपण खरेच शिक्षकांच्या प्रश्नाला मार्गी लावू शकतो का? हे न पाहता फक्त सत्तेसाठी अमाप खर्च करून निवडून येणे. आणि एकदा का निवडून आले तर मग शिक्षकांच्या समस्या खुंटीवर लटकवून आपमतलब साधण्यासाठी जे उमेदवार उभे आहेत. त्यांना शिक्षक चांगल्याच प्रकारे ओळखून आहेत.
त्यासाठी काही राजकीय आसाम्या बळजबरीने शिक्षकांवर दबाव आणत आपल्या ताकदीचा जोर दाखविण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव झुगारून स्वतंत्रपणे आपल्या मताचा अधिकार बजावत शिक्षक ह्या सर्व बाबींना चोखपणे उत्तर देणार असल्याची परिस्थिती लक्षात येत आहे.
उपरोक्त सर्वच बाबीतून राजकीय उमेदवारांना बाजूला सारीत अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता जोर धरत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏