वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार, रताळी येथील घटना
सिंदखेडराजा तालुक्यात सकाळीच अवकाळी पाऊस वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार रताळी येथील घटना सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा:- तालुक्यातील काही भागात आज दि. ३० एप्रिल, रविवारी सकाळी वीजांच्या कडकडाटात तासभर अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये साखरखेर्डा नजीकच्या रताळी येथे सकाळी ९.०० वा. सुमारास वीज पडून भिकाजी सखाराम जाधव ह्यांच्या मालकीच्या १६ बकऱ्या जागीच मरण पावलेल्या आहेत. सकाळी बकऱ्या सोडून शशिकला तेजराव आव्हाळे व शेतमालक भिकाजी सखाराम जाधव हे दोघेही शेतात बकऱ्या चारत होते. त्याचवेळी बाजूच्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. ह्यावेळी १६ बकऱ्या ठार झाल्या मात्र शेत मालक व महिलेने ट्रॅक्टर ट्रॉली खाली आश्रय घेतला होता. त्यामुळे सुदैवाने ते दोघे बचावले. घटनेचा पंचनामा करण्यासाठी महसूलचे तलाठी शेळके व पोलीस विभागाचे कर्मचारी तातडीने पोहोचले असल्याची माहिती सरपंच सौ. उषा समाधान पाटील यांनी दिली आहे.